सध्याचे जग कसे आहे असा प्रश्न कणालाही विचारला तर साधारणपणे जी उत्तरे येतात त्यात आपले जग फार वेगवान होत चालले आहे असे बरेच जण म्हणतात. अनेकांना नेमकं काय चालले आहे ते समजतच नाही. पुढे काय होणार? आपल्या मुलांचे काय होणार? आपल्या गुंतवणूकीचे आणि भविष्याचे काय होणार या चिंतेने जो तो हैराण असतो. पूर्वी ज्याप्रमाणे पुढील पाच पन्नास वर्षांचे नियोजन करता यायचे, एकदा नोकरी मिळाली की चिंता नाही असे अनेकांना वाटायचे. पण आता इतके संदर्भ बदलले आहेत की आपण ज्या मल्टीनॅशनल कंपनीचे भविष्यच सांगता येत नाही तर नोकरीचे भविष्य कसे सांगणार असे तरूण मुले विचारू लागले आहेत. दूर देशात चाललेल्या युक्रेन आणि रशियासारख्या जागतिक पातळीवर घडणा-या युध्दांचा आपल्या जीवनावर काही परिणाम होत असेल असा विचारही पूर्वी मनात येत नव्हता. पण आता थेट देशाच्या अर्थकारणावर या युध्दांचा परिणाम होत असल्याने सामान्य माणसाला युध्दाची झळ महागाईच्या रूपाने पोहचू लागली आहे.