गेल्या महिन्यात देशात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पंजाब वगळता इतर सर्व राज्यात भाजपने सत्ता हस्तगत केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केलंय. या निवडणुका म्हणजे २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम आहे असं मानलं, तर येत्या लोकसभा निवडणुकीतही भाजप सत्ता राखणार हेच दिसून येतंय. पण या सगळ्या गणितीय अकडेमोडीच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय आणि त्यावर चिंतन केलं जातंय, तो प्रश्न असा, की भाजप सातत्याने का जिंकतंय? नोटबंदी, इंधनाचे वाढते भाव, महागाई असे अनेक नकारात्मक मुद्दे असूनही भाजप सत्ता स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी कशी ठरतेय? या सगळ्या प्रश्नाचं एक उत्तर म्हणजे भाजपचं 'लाभार्थी मॉडेल'! हे मॉडेल नक्की काय आहे, आणि याचा मतदारांवर कसा प्रभाव पडतोय, हे आज आपण जाणून घेणार आहोत… चला तर मग!