जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात पैसा नावाच्या गोष्टीची गरज असते. ती गरज त्या व्यक्तीच्या कार्यातून, म्हणजेच उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र यापैकी फक्त एकाच गोष्टींतून ही गरज पूर्ण होत नाही. व्यक्तीला सतत आपल्या मिळकतीमध्ये विविध माध्यमातून भर घालावी लागते. मग यासाठी बचतीचा मार्ग अवलंबला जातो. 'आजची बचत ही उद्यासाठीची तरतूद असते' हे टिपिकल ठरलेलं वाक्य आपण अनेकदा ऐकत आलोय. पण केलेल्या बचतीचं पुढे काय होतं? बिझनेस वाढविण्यासाठी नवीन गुंतवणूक केली जाते का? की बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकले जातात? हे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत होतंय की ती केवळ बचतच राहतेय, हे बघणं महत्त्वाचं आहे.