'रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका' मराठी भाषेतील अजरामर गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी 'स्वयंवर झाले सीतेचे' या नाटकासाठी लिहिलेलं हे पद आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. श्रीलंकेच्या वैभवाचं अत्यंत रमणीय वर्णन या कवितेत गदिमांनी केलंय. अशी अजरामर कीर्ती लाभलेल्या, ऐतिहासिक काव्यांमध्ये सुवर्णनगरी म्हणून गौरविल्या गेलेल्या आणि जिचा जयजयकार तिन्ही दिशांमध्ये गाजला अशा श्रीलंकेची अवस्था आज एक भिकेला लागलेला देश अशी झालेली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि चीनच्या कर्ज योजनेत अखंड बुडालेल्या श्रीलंकेची आर्थिक अवस्था वाईट आहे. या कर्जाच्या खाईतून वर येण्याचा कुठलाच रस्ता सध्या तरी श्रीलंकेकडे नाही. आर्थिक स्थिती बिघडल्याने या देशात महागाई सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे. श्रीलंका या आर्थिक संकटात कशी अडकत गेली, आणि येत्या काळात श्रीलंकेचं काय होणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. चला तर मग…